दहावी आणि बारावी शिष्यवृत्ती योजना पुणे मनपा

पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनांतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि.  १३ ऑक्टोबर २०२१ ते २८ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

काय आहे योजना? किती मिळणार मदत?
दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयांची मदत करणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना आहे.

योजनेसाठीची पात्रता

  • योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
  • या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण असणे आवश्यक.
  • पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण असणे आवश्यक.
  • योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक.
  • योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.

 

विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा. सोबत आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करावीत.